सातारा – पालिकेने स्वतःच्या 40 घंटागाडया खरेदी करण्याची तयारी सुरू केली असून कर्जाने घंटागाडया घेतलेल्या चालकांचे काय करणार तसेच गाड्या चाळीस व चालक पाच हा आकृतीबंध कसा बसविणार असे प्रश्न पालिकेतील ज्येष्ठ सदस्य अशोक मोने यांनी उपस्थित केले.
नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सभागृहात 36 विषयांना मंजुरी देण्यात आली. या सेभेत घंटागाडी खरेदीच्या विषयामुळे लव्या वादाला फोडणी मिळाली. गाडया चाळीस व चालक पाच हा आकृतीबंध याप्रमाणेच 2001 मध्ये आकृतीबंध चुकला होता, याची आठवण अविनश कदम कदम यांनी करून दिली.
पन्नास लाखाचे जेसीबी घेतले मात्र त्याला ऑपरेटर नाही, यावरही मोने यांनी प्रशासनावर आगपाखड केली. गणेश विसर्जन तळ्यासाठी दरवर्षी पन्नास लाखाचा तोटा कशासाठी करून घ्यायचा, असा प्रश्नही त्यांनी केला. “”नगरपालिका अधिनियमांची चौकट सोडून पालिकेचा महसुली तोटा करणारे प्रस्ताव मंजूर करण्यात सातारा विकास आघाडीने धन्यता मानली. कास धरणाचे अर्धा टीएमसी पाणी वितरण करणारा प्रकल्प अहवाल पालिका स्वतःच्या खिशातले 67 लाख रुपये मोजून तयार करायला निघाली होती. “आंधळ दळतयं कुत्र पीठ खातयं,’ असा हल्लाबोल नगर विकास आघाडीचे स्वीकृत सदस्य अविनाश कदम यांनी यावेळी केला.
कास धरणाच्या वितरिकांचा प्रकल्प आराखडा करण्यासाठी नाशिकच्या ‘मेरी ‘ला 67 लाख रूपये देण्याचा प्रस्ताव बनवण्यात आला होता. यावर कदम यांनी तीव्र आक्षेप घेत ही रक्कम इस्टिमेटमध्ये घाला अशी सूचना केली. ऍड. दत्ता बनकर यांनी ही सूचना मान्य केली. पालिकेला खड्डयात घालणारे चुकीचे प्रस्ताव येथे तयार होतात यासारखे दुर्देव नाही, अशी टीका करीत कदम यांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. रखडलेली सफाई कर्मचारी भरती, नव्या कर्मचाऱ्यांची ओळखपरेड, अग्निशमन केंद्रात चालणारे गैरव्यवहार, टेंडरअभावी रखडलेली साडेतीन कोटीची विकास कामे, यावरून नगर विकास आघाडी व भाजपने मुख्याधिकारी शंकर गोरे यांना थेट जाब विचारत प्रशासनातले कच्चे दुवे दाखवले.
सातारा पालिका सभा छत्तीस विषय मंजूर, प्रशासनावर आगपाखड