पुणे – करोनामुळे अंशतः संचारबंदीसारखी स्थिती असल्याने व्यापारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी उतरवलेल्या विम्यामध्ये करोना व्हायरसमुळे झालेल्या नुकसानीचा समावेश करण्याची गरज असल्याचे व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या “सीएआयटी’ने म्हटले आहे.
सध्याची वेगळी परिस्थिती पाहता ज्या व्यापाऱ्यांनी विमा उतरलेला आहे त्यामध्ये आग आणि इतर नुकसानीचा समावेश असतो. त्यामध्ये करोना व्हायरसचाही समावेश करण्याचा पर्याय व्यापाऱ्यांना उपलब्ध होण्याची गरज असल्याचे या पत्रात म्हटले आहे. संघटनेचे महासंचालक प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, ‘विमा कंपन्यांनी गरज आधारित विमा उत्पादने विकसित करण्याची गरज आहे. अर्थमंत्रालयाबरोबरच या संघटनेने वाणिज्य मंत्रालयाला या आशयाचे निवेदन दिले आहे.’
सर्वच व्यवहारांवर परिणाम
गेल्या दोन महिन्यांपासून करोनामुळे केवळ देशांतर्गत व्यापारावरच नाही, तर परदेशी व्यापारावरही परिणाम झाला आहे. अगोदरच मंदीमुळे व्यापाऱ्यांची उलाढाल कमी झाली होती. त्यात आता करोनाने धुमाकूळ घातला आहे. लोक अगोदरच खरेदी कमी करत होते. आता शहरांमध्ये अघोषित संचारबंदी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे खरेदीचे प्रमाण आणखी कमी होणार आहे. त्यामुळे नुकसान होणार आहे.