मंचर -मंचर (ता. आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या पुतळ्याचे दहन करून कांदा निर्यातीवर आणलेल्या बंदीच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. 17) आंदोलन करण्यात आले.
आंदोलनावेळी वनाजी बांगर, प्रवीण पडवळ, पंकज पोखरकर, राहुल बांगर, हरिदास बांगर, नवनाथ बांगर, सचिन रामाने, विराज थिटे, ऋषीकेश सुर्वे, लहु गावडे यांसह शेतकरी उपस्थित होते. केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यातबंदीचा निर्णय हा शेतकऱ्यांवर अन्याय असून, निवडणुकीच्या राजकारणासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
कांदा निर्यातबंदीचा निर्णयात बदल करून निर्यात पुन्हा सुरू करावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर केंद्र सरकारच्या वतीने वारंवार अन्याय होत असून, निर्यातीला बंदी घालणे तसेच दुसऱ्या देशातून, पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्रातून कांद्याची आयात करून भारतीय शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव पाडले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक आहे. सरकारच्या विरोधात येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.