नगर -प्रोफेसर कॉलनी चौकात बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांसाठीचे आंदोलन निव्वळ राजकीय स्टंट आहे. सर्वच राजकीय पक्षांना त्यांना पुळका आला. मात्र, याच भाजीविक्रेत्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी, व्यापारी व रहिवाश्यांवर असलेली दहशत आणि चौकाचे होणारे विद्रुपीकरण कुणाच्याच लक्षात येत नाही का? असा संतप्त सवाल प्रोफेसर कॉलनी चौकातील गाळेधारक व्यापाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला विचारला.
प्रोफेसर कॉलनी चौकातील भाजी व्रिकेत्यांवरुन गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असलेली कथित श्रेयबाजी व आंदोलनाच्या विषयावरुन व्यापाऱ्यांनी आज त्यांच्या अडचणी महापालिका प्रशासनासमोर ठेवल्या. भाजीविक्रेत्यांमुळे होणारा व्यापारी वर्ग, स्थानिक रहिवासी यांना होणार त्रास व वाहतूक कोंडीतून निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर राजकीय दबावाला बळी न पडता निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. त्यांच्यावतीने उपायुक्त प्रदीप पठारे यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. विवेक वाडेकर, अशोक जोशी, राजु मुरकुटे, सुयश अवसरकर, सूर्यप्रकाश राठोड, प्रसन्न एखे, बाळू दराडे, अब्दुल रहिमान शेख, सागर भांड, प्रकाश जोशी, दीपक आगे, प्रशांत वाघ यांनी व्यापारी व स्थानिक नागरीकांची बाजू मांडली.
चौकातील अनेक गाळेधारक व्यापाऱ्यांनी देखील बॅंकेचे कर्ज घेऊनच व्यवसाय सुरु केले आहेत. मात्र, भाजीव्रिकेत्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. व्यापाऱ्यांची बाजू कोण घेणार? असा सवाल त्यांनी केला. यापुढे व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या कथित पुढाऱ्यांवरच व्यापारी संघटना बहिष्कार घालतील, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला.