नगर – नगर तालुक्यातील इमामपूर, बहिरवाडी तसेच मजले चिंचोली परिसरातील डोंगराला शनिवार दि. 20 रोजी रात्री लागलेल्या वणव्यात शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली आहे. अथक प्रयत्नानंतर वणवा आटोक्यात आणण्यात वन विभागाला यश आले.
याबाबत माहिती अशी की, इमामपूर तसेच बहिरवाडी परिसरातील चिमणा डोंगर, कडका डोंगर व मजले चिंचोलीच्या सोनदरा पट्ट्यात वणवा लागला होता. पठार तसेच दरीमध्ये वाळलेले मोठे गवत असल्याने वणव्याने रौद्ररूप धारण केले. यामध्ये शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली. अनेक औषधी वनस्पती, नैसर्गिक वृक्ष, पक्ष्यांची घरटे, खोफे, सरपटणारे प्राणी, पक्षी यांचे मोठे नुकसान झाले आहे.
वणव्यामुळे वन्य प्राणी, पक्षी जिवाच्या आकांताने सैरावैरा धावत होते. वन विभागाच्या वतीने वनपाल कृष्णा हिरे, वनरक्षक मनेष जाधव, वनरक्षक बाळासाहेब रणसिंग, वन कर्मचारी संजय सरोदे, अशोक पाटोळे या पथकने संपूर्ण रात्र वणवा विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. रविवार (दि.21) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वणवा आटोक्यात आणण्यात वन विभागाला यश आले. बहिरवाडी येथील सर्व्हे नंबर 1152, 1153 तर इमामपूर येथील सर्व्हे नंबर 1109 येथील क्षेत्राला वणव्याचा फटका बसला आहे.
मजले चिंचोलीचा सोनदरा जळून खाक झाला आहे. रात्रीचा अंधार, खोल दरी, वाळलेले गवत अन् वारा यामुळे आग विझविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. या रोपवनात करंज, बाहवा, वावळा, लिंब, सिताफळ, शिसव, वड, पिंपळाच्या सुमारे वीस हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. या क्षेत्रात वणव्याची आग गेली असती तर वनसंपदेचे अधिक प्रमाणात नुकसान झाले असते.
शेतकऱ्यांनी डोंगराच्या कडेला आपल्या शेतीचे बांध जाळू नये. जेणेकरून डोंगराला वणवा लागेल. तसेच वनसंपदा असणाऱ्या क्षेत्रात धूम्रपान करू नये. नागरिकांनी वनांचे जतन, संवर्धन करण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी केले.