नगर – केंद्र व राज्यात सत्तेचा उपयोग कष्टकरी समाजासाठी होत नाही. जाती-धर्माच्या नावावर संघर्ष उभा केला जात आहे. मात्र, आता चित्र बदलत आहे. कर्नाटकमध्ये कष्टकरी, सर्वसामान्यांच्या एकजुटीतून चित्र बदलले. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील असाच बदल एकजुटीने देशातही होईल. त्यासाठी एकजुटीने लढा उभारावा लागणार असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी रविवारी नगर येथे व्यक्त केले.
हमाल-मापाडी महामंडळाचे 21वे द्वैवार्षिक अधिवेशन येथील बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाचे उद्घाटन खा. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार नेते डॉ. बाबा आढाव होते. या वेळी स्वागताध्यक्ष आ. संग्राम जगताप, आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, आ.प्राजक्त तनपुरे, आ. नीलेश लंके, माजी आ. दादा कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.
यावेळी माथाडी कामगारांचे दिवंगत नेते शंकरराव घुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण, तसेच त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित “संघर्ष गाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन खा. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. हमाल मापाडींसाठी खस्ता खाणारा नेता असा स्व. शंकरराव घुले यांच्या कार्याचा गौरव करून खा. पवार म्हणाले की, जाती-धर्माच्या नावावर संघर्ष उभा केला जात आहे. नगर हा पुरोगामी जिल्हा आहे. मात्र, शेवगावमध्ये जातीय अंतर व संघर्ष निर्माण केला जात आहे. त्याविरुद्ध लढा दिला नाही तर कष्टकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल. हमाल मापाडींना कायद्याचे संरक्षण आहे.
या संरक्षणावर हल्ला करण्याचे काम काहीजण करीत आहेत. त्यांना माथाडी कायदा खुपतो. हा कायदा जुना झाला असे सांगत आहेत. परंतु हा कायदा सुखासुखी झालेला नाही. त्यासाठी मोठा संघर्ष उभा करावा लागला. माथाडींवर गुंडगिरीचा व पैसे लुबाडण्याच्या प्रयत्नाचे आरोप करून या चळवळीला बदनाम करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याविरोधात आवाज उठवावा लागेल व त्याविरुद्ध एकजूट दाखवावी लागेल. या संकटावर मात करणारी शक्ती आपल्याला उभी करायची आहे. तुमच्या हक्कावर गदा आणली गेली तर आमची ताकद तुमच्यामागे उभी असेल, असाही विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
बाबा आढाव म्हणाले, देश आज संकटात आहे, लोकशाही जिवंत राहील की नाही? घटनेचं काय होणार? लोकशाही-समाजवाद मान्य केला जाणार की नाही असे प्रश्न निर्माण झाले आहेत. पंतप्रधान मोदींना तर ही राज्यघटनाच मान्य नाही, असे असताना तुम्ही गप्प बसणार का असा सवाल करून आढाव म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा घटनेचा ढाच्या धोक्यात आला आहे. राज्यात राज्यघटनेचे की धर्माचे राज्य आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. या विरोधात लढा देण्याची आवश्यकता आहे.
या वेळी पद्मश्री पोपटराव पवार यांचेही भाषण झाले. स्वागताध्यक्ष संग्राम जगताप यांनी स्वागत केले. हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी विविध प्रश्न मांडले.