मुंबई : राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. देवेंद्र फडणवीस यांना सध्या दुसरं काहीही काम नाही.
त्यातच त्यांच्या मनासारखं काही होत नाही. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस यांची मन:स्थिती समजू शकतो, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच विरोधीपक्षांनी कितीही प्रयत्न केले तरी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खातेवाटपाबाबत जयंत पाटील म्हणाले, खातेवाटपाबाबत कुठलेही मतभेद नाहीत. आज किंवा उद्या खातेवाटप होईल. खातेवाटतात काहीही अडचण नाही. मुख्यमंत्री खातेवाटप लवकरच जाहीर करतील. कोणत्याही पक्षात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत नाराजी नाही. अशी नाराजी असल्यास तिन्ही पक्ष ती नाराजी दूर करण्यास सक्षम आहेत.
तसेच वस्तू आणि सेवा कराविषयी (जीएसटी) देखील बैठक झाल्याची माहिती त्यांनी दिली. जीएसटीचे उत्पन्न घटल्याने केंद्राकडून यायला हवा तो निधी येत नाही, असेही त्यांनी नमूद केले. तसेच पीएमसी बॅंकेचे विलीनीकरण राज्य सहकारी बॅंकेत करता येणार नसल्याचेही स्पष्ट त्यांनी केले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, मंत्रीमंडळ तयार होते आणि त्यानंतर खातेवाटप होते. मंत्रीमंडळ तयार झाल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये खातेवाटप होते. आमदार प्रणिती शिंदे या चांगल्या काम करत आहेत. त्यांनी मंत्रिमंडळात असावे, असे आम्हाला वाटत होते, पण ते होऊ शकले नाही.
त्यामुळे थोडीशी नाराजी आहे. खातेवाटप करताना काही बदल अपरिहार्य असतो. पण कॉंग्रेसमुळे खातेवाटप करण्यात उशीर झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. ते लवकरच हा निर्णय जाहीर करतील असं गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.