वाघोली -ग्रामविकास विभाग, राज्य शासन अधिसूचना, उच्च न्यायालय मुंबई यांच्या अंतरिम निर्णयानुसार पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील 20 ऑगस्ट अखेर मुदत संपलेल्या 47 ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासकाची नियुक्ती केली आहे. बारा अधिकाऱ्यांची 47 ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे बलाढ्य आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायतींचा गाडा अधिकाऱ्यांना हाकावा लागणार असल्यामुळे यात प्रशासनाचीच कोंडी होणार आहे.
महामारीमुळे राज्य निवडणुक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य झाले नसेल तर राज्य शासनास राज्यपत्रातील अधिसूचनेव्दारे अशा पंचायतीचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी तरतूद केली आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशासकांची नियुक्ती केली आहे. त्यांना (दि.21) पासून नेमून दिलेल्या ग्रामपंचायतीकडील प्रशासकपदाचा कार्यभार तात्काळ स्वीकारण्याचा आदेश दिला आहे.
तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीवर 12 प्रशासकांची नियुक्ती केली आहे. यात पूर्व हवेली तालुक्यातील अनेक गावे राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. विकासकामांबाबत अग्रेसर असलेल्या या गावांत आता विकासकामांचा डोलारा थांबणार काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. अष्टापूर, केसनंद व शिरसवडी, उरूळी कांचन, लोणी काळभोर, थेऊर, मांजरी खुर्द, खेड- शिवापूर आदी गावे तालुक्यात तसेच जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेली आहेत.
नियुक्त केलेल्या काही प्रशासकांना किमान दोन गावे वाट्याला आली आहेत. काही प्रशासकांना तीन ते सहा गावांचा गाडा हाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना कामकाज करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे, अशी प्रतिक्रिया उमटली आहे.