बेल्हे-जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील 10 गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना “दुष्काळी’ नुकसान भरपाई मिळणार आहे. दोन वर्षांनंतर शासनाला “दुष्काळ भरपाई’ देण्याची सुबुद्धी सुचल्याने बाप्पा पावला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
बांगरवाडी, गुळुंचवाडी, गुंजाळवाडी, रानमळा, उंचखडक, आणे, आनंदवाडी, नळावणे, शिंदेवाडी व पेमदरा गावांतील बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईबाबत अनुदान मंजूर झाले आहे, अशी माहिती कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी बेल्हे येथे बुधवारी (दि. 26) सायंकाळी झालेल्या बैठकीत दिली. याप्रसंगी बांगरवाडीचे सरपंच जालिंदर बांगर, राष्ट्रवादी युवकचे जुन्नर तालुका कार्याध्यक्ष अतुल भांबेरे, कृषी सर्कल अधिकारी गंभीरे, तलाठी विजय साळवे उपस्थित होते.
2018 मध्ये जुन्नर तालुक्यातील 6 महसूल मंडळे ही दुष्काळी म्हणून जाहीर केली होती. यासाठी राज्य सरकारने नुकसानभरपाई मंजूर केली होती; परंतु 6 मंडळे दुष्काळ यादीत असून भरपाईबाबत तालुका महसूल प्रसासनाने सरकारकडे प्रस्तावच न पाठवल्याने हजारो शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित राहिले होते. सरपंच जालिंदर बांगर यांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता.