पुणे – राज्यातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी बालभारतीने यंदा सहा विषयांचा समावेश असलेले एकच पुस्तक तयार केले. या एकात्मिक पाठ्यपुस्तकांच्या बांधणीचा दर्जा निकृष्ट असल्याने पुस्तकांची बांधणी उसवत असल्याची कबुली शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिली. सदोष पाठ्यपुस्तके पुरवठा करणाऱ्या मुद्रकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.
राज्यात यंदापासून दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वह्यांची पाने समाविष्ट असलेले एकात्मिक पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले. अधिवेशनात विजय वडेट्टीवार, सुनील केदार, अस्लम शेख यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला. एकात्मिक पाठ्यपुस्तकांचा दर्जा व बांधणी निकृष्ट दर्जाची असून आतील पाने देखील फाटलेली असल्याचे निदर्शनास आले आहे. याच पुस्तकांचे अनेक जिल्ह्यात वाटप करण्यात आले असून विद्यार्थ्यांना ते वापरण्यास गैरसोयीचे झाले आहे. या प्रकरणाची शासनाने चौकशी करुन संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर कोणती कारवाई करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
वह्यांची पाने जोडलेली चार भागातील एकात्मिक पाठ्यपुस्तके पथदर्शी स्वरुपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय दि. 8 मार्च 2023ला घेण्यात आला होता. औरंगाबाद जिल्ह्यातील जळगाव मेटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या एकमेव शाळेतील सातवीचे बालभारती एकात्मिक भाग एक (मराठी, सेमी-इंग्रजी माध्यम) या पुस्तकाची पाने सुटत असणारी 34 पुस्तके होती. ही पाठ्यपुस्तके तातडीने बदलून देण्यात आल्याची माहिती केसरकर यांनी दिली. दि. 4 जुलै 2023ला बालभारतीकडून संबंधित मुद्रकात कारणे दाखवा नोटीसही बजाविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.