शिर्डी – साई संस्थान विश्वस्त मंडळ नव्याने स्थापन करण्यासाठी राज्याच्या विधी व न्याय विभागाने विश्वस्त मंडळ निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व विश्वस्त अशी तीन वर्षांसाठी ही निवड करण्यात येणार आहे. दि. 17 मेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. अर्जाचा नमुना व इतर तपशील शासनाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. दरम्यान, आपली वर्णी लागावी यासाठी भाजप व शिवसेनेतील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली.
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या साई संस्थानला तब्बल एक तपानंतरही कायदेशीर विश्वस्त मंडळ मिळू शकले नाही, ही मोठी शोकांतिका आहे. चार वेळेस स्थापन झालेले विश्वस्त मंडळ न्यायालयाच्या कचाट्यात सापडले आहे. एकीकडे याचिकाकर्ते संजय काळे व संदीप कुलकर्णी यांनी वारंवार शिर्डी साई संस्थांनच्या विश्वस्त मंडळातील गैरकारभाराविरुद्ध तसेच नियमबाह्य नियुक्ती विरोधात खंडपीठात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने आता नवीन विश्वस्त मंडळ स्थापनेचा आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. साई संस्थांनच्या इतिहासात प्रथमच इच्छुकांनी विश्वस्त होण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
यासाठी अर्ज करून तो साई संस्थांनच्या नेमलेल्या कमिटीकडे द्यायचे आहे. याची मुदत 17 मेपर्यंत असल्याने आता इच्छुकांची एकच धांदल उडाली आहे. साई संस्थांनचे विश्वस्तपद हे खूप प्रतिष्ठेच मानले जाते. याच पदाच्या सानिध्यातुन देशविदेशातील अनेक श्रीमंत भाविकांच्या ओळखी, मंत्री, अभिनेते, अभिनेत्री याचबरोबर दिग्गज लोकांच्या बरोबर ओळखी होत असतात. त्यामुळे या पदासाठी इच्छुकांकडून मोर्चोबांधणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातून सात विश्वस्त नेमण्याची संस्थांनच्या घटनेत तरतूद असल्याने नियम व अटी, शर्ती याबाबींचा विचार केला तर यावेळी विश्वस्त मंडळातील सदस्यांची नियुक्ती ही उच्च न्यालायाचे निवृत्त न्यायाधीश यांची गठीत केलेली समिती निर्णय घेणार आहे
शिर्डीतील संभाव्य इच्छुकांमध्ये कैलासबापू कोते, अभय शेळके पाटील, राजेंद्र गोंदकर, कमलाकर कोते, विजय जगताप, ऍड. अनिल शेजवळ, सचिन शिंदे, ताराचंद कोते, सचिन तांबे, ऍड. संदीप गोंदकर यासह शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्रातील अनेक उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता असली तरी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खास मर्जीतील ग्रामस्थांची निवड होऊ शकते तर ऐनवेळी चर्चेत नसणाऱ्या एखाद्या तरुणाची लॉटरी लागू शकते.