शिर्डी – शिरूर येथील साईभक्त शेतकरी रवी नारायण करगळ यांनी साधारणतः 2 लाख 2 हजार किमतीचे 2527 किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात देणगी स्वरूपात दिल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.
हे साईभक्त चार ते पाच वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले आंबे देणगी स्वरूपात संस्थान प्रसादालयासाठी देत आहेत. मागील वर्षीही करगळ यांनी सुमारे 4 लाख 25 हजार रुपये किमतीचे 5 हजार किलो केशर आंबे देणगी स्वरूपात दिले होते. त्याचा एक लाखाहून अधिक साईभक्तांनी लाभ घेतला होता. देणगी स्वरूपात प्राप्त झालेले केसर आंबे रासायनिक प्रक्रिया न करता, नैसर्गिकरीत्या पिकविलेले व उच्च प्रतीचे आहेत.
आजपासून संस्थानच्या साई प्रसादालयात संस्थान कर्मचाऱ्यांच्या श्रम परिहारासाठी व साईभक्तांच्या प्रसाद भोजनासाठी या आंब्यांच्या रसाचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगून सर्वांनी या प्रसाद भोजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.