जिल्हा रुग्णालयालगतच्या टपऱ्या हटवल्या; सदरबझारमध्ये “शहर विकास’चा दणका
सातारा – क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयालगत, सिटी सर्व्हे नं. 487/6 अ, सदरबझार येथील अनधिकृत टपऱ्यांची अतिक्रमणे पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी हटवली. यात प्रामुख्याने खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या स्टॉल्सचा समावेश होता. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासमोरचा रस्ता प्रशस्त झाला आहे. मात्र, या धडक कारवाईसाठी विभागीय आयुक्तांकडून आदेश येण्याची वेळ आली.
पोवई नाका ते जरंडेश्वर नाका या रस्त्यावर जिल्हा रुग्णालयासमोर, देशमुख कॉलनीलगत हॉटेल, फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार देशमुख कॉलनीतील रहिवासी अशोक जरे यांनी नगरपालिकेकडे केली होती. मात्र, पालिकेने या तक्रारीची दखल न घेतल्याने जरे यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली. या प्रकरणी विभागीय आयुक्तांकडून आलेल्या आदेशानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पालिकेला कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार शहर विकास विभागातील अतिक्रमणविरोधी पथकाचे निरीक्षक प्रशांत निकम, भाग निरीक्षक सतीश साखरे व दहा कर्मचारी जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी आले.
जिल्हा रुग्णालयाच्या कुंपण भिंतीलगत चार हॉटेल्सच्या पत्र्याच्या शेड्सची अतिक्रमणे करण्यात आली होती. या चाळीस फुटी रस्त्यावर पंधरा फुटांपर्यंत अतिक्रमणे होती. या चार हॉटेल्सच्या पत्र्याच्या शेड्स हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या. रस्त्याच्या विरुद्ध बाजूला पक्क्या बांधकामांची अतिक्रमणे आहेत. ती हटविण्यासाठी जेसीबी तात्काळ उपलब्ध न झाल्याने जिल्हा रुग्णालयाच्या कुंपण भिंतीजवळची अतिक्रमणे हटविण्यास पथकाने सुरुवात केली. मुथा चौक-देशमुख कॉलनी-जिल्हा रुग्णालयाचे प्रवेशद्वार या दरम्यान खाद्यपदार्थांच्या टपऱ्या हटवण्यात आल्या. काही वेळा वादावादी झाली तरी पालिकेचे पथक मागे हटले नाही. कथित पुढाऱ्यांचे फोन येऊनही अतिक्रमणविरोधी पथकाने मोहीम सुरुच ठेवली. त्यामुळे रस्त्याची ही बाजू दुपारी दोन वाजेपर्यंत पूर्णपणे मोकळी झाली.
दोन विभागांमध्ये वाद
पालिकेचा जेसीबी परिवहन विभागात उभा होता. मात्र, तो आजच्या मोहिमेसाठी उपलब्ध झाला नाही. या आधी रविवार पेठेतील मोहिमेतही पालिकेची नामुष्की झाली होती. पालिकेची यंत्रणा उपलब्ध असतानाही त्यावेळी जेसीबी भाड्याने घ्यावा लागला होता. पालिकेच्या वाहनांना गंज लागेपर्यंत ती उभी केली जातात, असा परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. पालिकेच्याच परिवहन व शहर विकास विभागांमध्ये विळ्या-भोपळ्याचे सख्य असल्याची चर्चा आहे. या दोन विभागांमधील भांडण मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी मिटवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.