सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव यांचे निर्देश
आकृतिबंध निश्चित करण्याचे काम सुरू
पुणे – राज्यातील साखर कारखान्यांना आकृतिबंध आराखडा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन आकृतिबंध निश्चित होईपर्यंत राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये नोकर भरतीला मनाई करण्यात आली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव प्रमोद वळंज यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्रात एकूण 195 साखर कारखाने आहेत. सध्या राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. अनेक कारखाने बंद पडले आहेत, तर काही कारखान्यांची विक्रीदेखील झाली आहे. साखर उद्योगाला प्रगतीकडे नेण्यात त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचा महत्त्वाचा वाटा असतो. मात्र, या कारखान्यांध्ये होणारी अनावश्यक नोकरभरती ही त्या कारखान्याच्या खर्चात वाढ करणारी असते. साधारणपणे एकूण उत्पन्नाच्या 35 टक्के रक्कम मनुष्यबळाच्या वेतनावर खर्च झाल्यास, त्या उद्योगाला अन्य बाबींसाठी खर्च करणे योग्य ठरते.
सध्या राज्यातील साखर कारखान्यांची निवडणूक जवळ आली आहे. तर, साखर कारखान्यांची होणारी पडझड रोखण्यासाठी या कारखान्यांचा आकृतिबंध निश्चित करण्याची मागणी साखर आयुक्तालयाने केली होती. त्यानुसार एका समितीची स्थापना देखील करण्यात आली असून आकृतिबंध निश्चित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे हा आकृतिबंध निश्चित होईपर्यंत तसेच त्याला शासनाची मान्यता मिळेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत नोकरभरती केली जाऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत.