Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांनी सबका साथ-सबका विकास या आमच्या मंत्राचा वापर करून देशाचा विकास करण्यात आला. आमच्या सरकारने व्यापक विकासाची कामे केली असे म्हणत अर्थसंकल्प वाचनास सुरूवात केली. सर्वांचे लक्ष लागलेल्या या अंतरिम बजेटमध्ये गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जातींवर आमचे लक्ष आहे. त्यांच्या गरजा, त्यांच्या आकांक्षा आमच्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.
बजेटमध्ये युवकांसाठी काय?
सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरुणांच्या सक्षमीकरणावरही काम केलं आहे. तीन हजार नवीन आयटीआय खुल्या करण्यात आल्या आहेत. तसेच 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला आहे, असे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले आहे. तसेच देशात सात नवे IIT आणि 7 नवे IIM आणि नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरु करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे. तसेच आम्ही सामान्यांच्या हितासाठी काम करत आहोत असे म्हणत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. २०४७ पर्यंत देश विकसित देशांच्या यादीत समावेश असेल असा दावा देखील यावेळी त्यांनी केला.
गेल्या 10 वर्षात आम्ही सर्वांसाठी घरे, प्रत्येक घराला पाणी, सर्वांसाठी बँक खाती अशी कामे विक्रमी वेळेत पूर्ण केली आहेत. 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली. संसाधनांचे वितरण पारदर्शकतेने करण्यात आले आहे. सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.