नवी दिल्ली – केंद्र सरकारने सोमवारी मांडलेल्या अंदाजपत्रकात सकस आहार पोहोचवण्यासाठी आणि त्याचे फलीत प्राप्त करण्यासाठी मिशन पोषण 2.0 ही योजना जाहीर करण्यात आले आहे. पुरक आहार योजना आणि पोषण अभियान या दोन्ही योजनांचे यात एकत्रिकरण करण्यात आले आहे.
आहारातील सकसपणाला प्राधान्य देण्यासाठी, ते पोहोचवण्यासाठी, त्याची फलनिष्पत्ती मिळवण्यासाठी आम्ही पुरक आहार योजना आणि पोषण अभियानाचे एकत्रिकरण करून मिशन पोषण 2.0 सुरू करत आहोत. गरज असणाऱ्या 112 जिल्ह्यातील पोषकता वाढवण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.
महिला आणि बालकल्याण विभागासाठी 24 हजार 435 कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली असून त्यातील 20 हजार 105 कोटी रुपये सक्षम अंगणवाडी अणि मिशन पोषण 2.0 साठी वापरण्यात येणार आहेत. पोषण 2.0 योजना ही बाल विकास सेवा, अंगणवाडी सेवा, पोषण अभियान, किशोरवयीन मुलींसाठीच्या योजना, राष्ट्रीय शिशूगृह योजना यांची शिखर योजना असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.