जम्मू : आंतरराष्ट्रीय सीमेच्या (आयबी) लगत थैमान घालत पाकिस्तानी सैनिकांनी सोमवारी रात्री भारतीय हद्दीत अंदाधुंद मारा केला. त्या माऱ्यात भारतीय सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान जखमी झाला.
पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू-काश्मीरच्या पूँच आणि कठुआ जिल्ह्यांमधील भारतीय सीमा नाक्यांना आणि गावांना लक्ष्य केले. त्यांनी तोफगोळ्यांचा मारा आणि गोळीबार केला. त्या माऱ्याला बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
दोन्ही बाजूंमध्ये मंगळवारी पहाटेपर्यंत चकमकी सुरू होत्या. बीएसएफने दिलेल्या प्रत्युत्तरात झालेल्या पाकिस्तानच्या हानीची माहिती तातडीने मिळू शकली नाही. चालू वर्षी पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी भंगाच्या आगळिकींमध्ये वाढ झाली आहे. पाकिस्तानी सैनिकांन चालू वर्षात आतापर्यंत नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत 2 हजारहून अधिक वेळा मारा केला. त्यामध्ये आतापर्यंत 21 जण मृत्युमुखी पडले, तर अनेक जखमी झाले. पाकिस्तानी माऱ्याला बीएसएफबरोबरच भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. त्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी बाजूचीही मोठी जीवितहानी होत आहे. तरीही शस्त्रसंधी भंगाच्या कुरापती थांबवण्याचे शहाणपण पाकिस्तानला सुचताना दिसत नाही.