मावळात सुरू झालेली शासनाची संस्था येवलेवाडीच्या कॉलेजमध्ये
– व्यंकटेश भोळा
पुणे – राज्यात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट दर्जाचे मनुष्यबळ निर्माण व्हावे, यासाठी पुण्यात आयआयआयटी (ट्रीपलआयटी – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) ही केंद्रीय संस्था सुरू करण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून पुण्यात “ट्रीपलआयटी’ दर्जाची शैक्षणिक संस्था कार्यरत आहे आणि ती कुठे सुरू आहे, याची माहिती पुणेकरांना असेलच असे नाही. पण, ही संस्था आता येवलेवाडी येथील केजे एज्युकेशन संस्थेच्या संकुलात सुरू आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 2015 मध्ये पुणे आणि नागपूर येथे “ट्रीपलआयटी’ संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य सरकारने 2016 मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे व नागपूर येथे “ट्रीपलआयटी’ संस्था स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब केले. पुण्यातील संस्थेसाठी नाणोली (ता. मावळ) येथे 100 एकर जागा देण्यात आली. त्याठिकाणी 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली.
दरम्यान, त्या ठिकाणच्या जागेवर स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे भाडेतत्वावर सुदुम्बरे येथील सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संकुलात वर्ग सुरू करण्यात आले. या संस्थेच्या शैक्षणिक प्रवेशाची माहितीचा शोध घेतला असता, ही संस्था आता यंदापासून येवलेवाडीच्या ट्रिनिटी कॉलेजच्या संकुलात सुरू असल्याचे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे, तर यंदापासून संस्थेचे संचालक म्हणून डॉ. अनुपम शुक्ला यांचीही नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत या संस्थेस मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावणाऱ्या “सीओईपी’चे कामही कमी झाले आहे. यंदा संस्थेच्या 100 टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची संधी मिळाली असून, त्याप्रमाणे रिसर्चही होत आहे, अशी माहिती संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
यंदाचे प्रवेश जवळपास पूर्ण
प्रारंभी संस्थेत कॉम्प्यूटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन अशा दोन शाखांतून बी.टेक.चे शिक्षण दिले जाते. त्याची प्रवेशाची क्षमता प्रत्येकी 60 होती. जेईई-मेनमधील उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असतात. यंदा प्रवेश क्षमता वाढवण्यात आली. बहुधा नव्याने सुरू झालेल्या संस्थेला अपेक्षित उंची गाठता आली नाही. मात्र, आता विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढला आहे. दोन्ही शाखांची तुकडी वाढवण्यात आली असून, आता प्रवेशाची क्षमता 225 आहे. त्यापैकी 210 प्रवेश झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जागा बदलली
नाणोली येथील 100 एकर परिसरात सीमाभिंत बांधण्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आता मुख्य इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. त्यादरम्यान जवळच एका खासगी संस्थेत वर्ग सुरू करण्यात आले. तेथे विद्यार्थ्यांसाठी वाहन व्यवस्था नव्हती. त्यामुळे मोठी गैरसोय होत होती. अखेर मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मान्यतेनंतर आता येवलेवाडी येथील संस्थेची निवड केल्याची माहिती संस्थेमार्फत देण्यात आली.