नवी दिल्ली – भारताबरोबर मुक्त, भविष्यकाळासाठी उपयुक्त आणि आधुनिक मुक्त व्यापारी करार करायला ब्रिटन उत्सुक आहे, असे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी म्हटले आहे. असा करार अस्तित्वात येण्यासाठी अजून थोडा अवधी बाकी आहे. मात्र असा करार अस्तित्वात येण्याचा आपल्याला विश्वास वाटतो आहे.
हा करार दोन्ही देशांसाठी फायद्याचा असेल. दोन्ही देशांमधील व्यापार 2030 पर्यंत दुपटीने वाढवण्याची समान महत्वाकांक्षा प्रत्यक्षात येण्यास यामुळे फायदाच होईल, असेही सुनक यांनी म्हटले आहे. “जी-20’शिखर परिषदेसाठी सुनक भारतभेटीवर येणार आहेत. त्यापूर्वी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपली मते व्यक्त केली.
ब्रिटनबरोबरच्या व्यापार करारामुळे ब्रिटनची बाजारपेठ उपलब्ध होण्याचा फायदा भारतातील 48 दशलक्ष लघु आणि मध्यम उद्योगांसह भारतीय निर्यातदारांना होईल. आपल्यातील व्यापारी संबंधांचा विस्तार करणे विलक्षण असेल.
मुक्त व्यापार करारासंदर्भात भारताबरोबर चर्चा करणारा ब्रिटन हा युरोपातील पहिला देश असणेही विलक्षण आहे. या कराराबाबतची चर्चा प्रगतीपथावर आहे. या चर्चेच्या 12 फेऱ्या गेल्या महिन्यात झाल्या आहेत. अजूनही काही गुंतागुंतीचे, संवेदनशील आणि वस्तू, सेवा आणि गुंतवणूकीसारख्या व्यवसायिकदृष्ट्या अर्थपुर्ण मुद्यांवर चर्चा बाकी आहे, असल्याचे सुनक म्हणाले.
मुक्त व्यापार कराराबाबतच्या वाटागाटी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षी दिवाळीपर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र काही मुद्यांवरील मतभेद आणि ब्रिटनमधील राजकीय घडामोडींमुळे या वाटाघाटी पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या, असेही सुनक यांनी सांगितले.