लखनौ :– महिला पैलवानांच्या आंदोलनामुळे प्रचंड अडचणीत आलेले कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी उद्या म्हणजे 5 जून रोजी अयोध्येत जनचेतना रॅलीचे आयोजन केले होते. त्याद्वारे ते शक्ती प्रदर्शन करणार होते. मात्र आता त्यांनी हा मेळावा रद्द केला आहे. आता 11 तारखेला होणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमात भाषण करून ते आपली भूमिका मांडणार आहेत.
पोलिसांकडून पैलवानांशी संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर मेळावा रद्द करण्यात आल्याचे ब्रिजभूषण यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे जाहीर केले आहे. तपास सुरू असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ब्रिजभूषण यांनी जो मेळावा आयोजित केला होता त्यासाठी चलो अयोध्याचा नाराही दिला होता. साधू संत आणि महंत अशा सगळ्यांनाच त्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यात ते आपली ताकद दाखवणार होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाचा आदेश वगैरे नाही तर अयोध्या येथील प्रशासनानेच त्यांना या मेळाव्यासाठी परवानगी नाकारली आहे.
त्यामुळे भाजपही आता ब्रिजभूषण यांच्यापासून लांब जाउ पाहते आहे का, हा नवा विषय चर्चेला येऊ घातला आहे. 11 जून रोजी भाजपचा अन्य जिल्ह्यात एक मेळावा होणार असून त्यात त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.