मुंबई – मुंबईतील लोकांना ठाकरे गटाबाबत सहानुभूती आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुका या एकत्र लढण्याबाबतची ठाकरेंसोबत चर्चा करणार असल्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला हिरवा कंदील मिळाल्यानंतर राजकीय पक्षांनी आगामी मनपा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. अनेक राजकीय पक्षांचे नेते हे महानगरपालिकांमध्ये जाऊन तिथे आढावा बैठक घेत आहेत. तसेच महानगरपालिकेची एकंदर स्थिती जाणून घेत आहेत.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबाबत अजित पवार म्हणाले, जर का आता सर्व्हे केला तर त्यामध्ये शिवसेनेला (ठाकरे गटाला) जागा जास्त दाखवत आहे. मुंबईतल्या लोकांना निश्चितपणे शिवसेनेबद्दल एक सहानुभूती आहे. ज्या प्रकारे मधल्या काही काळात राजकीय घटना घडलेल्या होत्या, त्यामधून शिवसेनेचे प्रमुख आणि आमचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मुंबई शहरामध्ये तसा खूप काही ताकदीचा नाही. आमचे कमी आमदार या ठिकाणी निवडून येतात, नगरसेवक ही कमीच निवडून येतात. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना एकत्र सामोरे जाऊ, अशी विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी याबाबत कोणताही होकार किंवा नकार दिलेला नाही. त्यामुळे शिवसेनेला आणि खास करून उद्धव ठाकरे यांना लोकांकडून मिळणाऱ्या सहानुभूतीमुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जर का ठाकरे गटासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी केली तर याचा फायदा त्यांनाही मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गटासोबतच आपली आघाडी करणार असल्याचे दिसून येते.