मुंबई – राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आज 27 फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. तब्बल महिनाभर या अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या एक दिवस आधी आयोजित केलेल्या पारंपारिक चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला असून, ‘दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंध असलेले लोक समोर आले नाहीत हे चांगले आहे’. अशी घणाघाती टीका देखील केली आहे.
सोमवार पासून सुरू झालेले राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चला संपणार आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस, ठाकरे गट आणि कॉंग्रेस यांनी रविवारी सरकारने आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानावर बहिष्कार टाकला असल्याचं दिसून आलं. यावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “एकप्रकारे विरोधी पक्ष चहासाठी आला नाही हे चांगले आहे कारण त्यांच्यापैकी काहींचे दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत. आमच्या युतीला महाराष्ट्रद्रोही म्हणण्याऐवजी तुम्ही या लोकांना देशद्रोही म्हणणार नाही का? असं ते म्हणाले.
दरम्यान, आता मुख्यमंत्री शिंदेच्या या टिकेवर राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून पलटवार केला गेला आहे. आव्हाडांनी शिंदेंना एक प्रश्न विचारला आहे. ‘सुभाषसिंग ठाकूर कोणाचा माणूस आहे? याचं उत्तर द्यावं…’ असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसेच, “राज्याची एकंदरीत दयनीय अवस्था झालेली आहे. राज्य कर्जबाजारीच्या परिस्थितीत आहे. लोकांवर डोक्यावर हजारो रुपयांचं कर्ज आहे. केवळ घोषणाबाजी केली जात आहे..’ असे देखील आव्हाड म्हणाले.