पुणे -राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पण, अजूनही किमान तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले आहे. राज्यातील सर्वात कमी तापमान पुण्यात 12.1 अंश सेल्सिअस नोंदवले आहे. तर अकोला जिल्ह्यात कमाल 38.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हात कोरडी हवा वाहत असल्यामुळे कमाल तापमान 36 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले आहे. तर उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात देखील कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदवली आहे. कोकण किनारपट्टीवर दमट हवामानामुळे कमाल तापमान विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत कमी नोंदवले असले तरी पारा 35 अंश पेक्षा अधिक नोंदवला आहे.
तापमानाचा पारा वाढल्यामुळे नागरिकांची उकाड्यामुळे चांगलीच घालमेल होत आहे. उन्हाच्या झळांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. मार्च महिण्यात सुर्यकिरणे जमीनीवर लंबरूप पडतात. सुर्यकिरणे लंबरूप पडल्यामुळे दिवसा जमीनीत मोठ्या प्रमाणात उष्णता शोषूण घेतली जाते आणि रात्री उष्णता उत्सर्जित केली जाते, त्यामुळे रात्रीच्या तापमाणात वाढ होत आहे. तसेच दिवसा कोरडे वारे वाहत असल्यामुळे तापमान वाढीचा परिणाम जाणवत आहे. पुढील दोन दिवसात तापमानात आणखी दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागातील तज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली.