मुंबई : क्रुज ड्रग्ज प्रकरणावरून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. त्यातच एनसीबीचा पंच असलेल्या प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळ वळण आले आहे. या आरोपांमुळे आपल्यावरील कारवाई टळावी यासाठी समीर वानखेडे प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या पहिल्यांच प्रयत्नाला ब्रेक लागला आहे.
प्रभाकर साईल याने केलेले आरोप ग्राह्य धरु नये, यासाठी वानखेडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयात प्रकरण असल्यामुळे सुनावणीला सत्र न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
वानखेडे यांनी सत्र न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले. यामध्ये त्यांनी म्हटल की, आपली वैयक्तीक बदनामी केली जात असून सोशल मीडियावर कुटुंबियांची खासगी माहिती उघड केली जात आहे. याचा परिणाम तपासावर होत आहे. त्यामुळे तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली होती.
दरम्यान सत्र न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. तुम्हाला जे काही सांगायचं ते उच्च न्यायालयात सांगा. सत्र न्यायालयासाठी हे प्रकरण पूर्णपणे संपलं आहे, असं सत्र न्यायालयाने म्हटलं आहे.