कारभार सुधारण्याची तंबी; कामात बदल न केल्यास कारवाईचा इशारा
सातारा, दि. 25 (प्रतिनिधी)- गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी सातारा शहर पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. पोलीस ठाण्यातील सावळा गोंधळ आणि बेशिस्तीमुळे संतापलेल्या ना. देसाई यांनी पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्यांना चांगलेच झापले. दररोज वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्यांचा दाखला देत दिवाळीपूर्वी कारभार सुधारा अन्यथा शासन स्तरावरून कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
याबाबत माहिती अशी, कारभारी बदलल्यापासून सातारा शहर पोलीस ठाण्याला अवकळा येत चालली आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचे अनेक घटनांवरून दिसत होते. याबाबत दै. “प्रभात’ने परखड वृत्त प्रकाशित केले. शहर पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्यांच्या वर्तणुकीला लगाम घालण्याची सातारकरांची मागणी चव्हाट्यावर आणली. शहरात गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण, चोऱ्या, मारामाऱ्या होत असूनही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपयश येत होते. गुन्ह्यांचा आलेख कमी दाखवण्याच्या प्रयत्नात अनेक गुन्हे दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे वास्तव “प्रभात’ने मांडले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेऊन शंभूराज देसाई यांनी आज शहर पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. पोलीस ठाण्यातील सर्व विभागांची पाहणी करून त्यांनी उपस्थित तक्रारदारांशी संवाद साधला. त्यानंतर देसाई यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी दालनात जाऊन सध्या सुरू असलेल्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. दिवाळीपूर्वी कारभार सुधारा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा त्यांनी पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना दिला. खुद्द गृह राज्यमंत्र्यांनीच कारभाऱ्यांना फटकारल्याची चर्चा पोलीस दलात सुरू झाली आहे.
गृहराज्यमंत्र्यांनी दुचाकीवरून गाठले पोलीस ठाणे
ना. शंभूराज देसाई सोमवारी सातारा शहर पोलीस ठाण्यात पाहणीसाठी निघाले तेव्हा त्यांनी सुरक्षा रक्षक, वाहनांचा ताफा असा लवाजमा सोबत घेतला नाही. त्यांनी त्यांच्या आवडीच्या यामाहा कंपनीच्या दुचाकीवरून पोलीस ठाणे गाठले. त्यामुळे त्यांच्या या रपेटची ना पोलिसांना काणकूण लागली ना नागरिकांना.