सोलापूर – कोविड संसर्ग काळात सर्वजण एकत्रित येऊन व्यवस्थित काम करत आहेत. मात्र, यावेळी काही पोलिसांचा मृत्यू देखील झाला. राज्यशासन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतचं ज्या पोलिसांनी उत्कृष्ट सेवा केली, त्यांना शौर्य पुरस्कार देणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करोना संसर्ग परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजेश टोपे आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
सोलापूर जिल्ह्यात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. करोना विषाणूने मृत्यू झालेल्यांची संख्याही जास्त आहे. याच पार्श्वभूमीवर आज आरोग्य मंत्री राजेश टोपे सोलापूर जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच शहिद सीआरपीएफ जवान सुनील काळे यांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.
यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेही उपस्थित होते. काळे कुटुंबियांतील एका पदवीधर व्यक्तीला शासकीय नोकरी आणि कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचे आश्वासन या तिन्ही मंत्र्यांनी दिले.