नवी दिल्ली – मोठ्या उद्योगासह छोट्या उद्योगावरही करोनाव्हायरसमुळे प्रचंड परिणाम झाला आहे. हा परिणाम काही महिने रेंगाळणार आहे. यातून हे उद्योग बाहेर पडावे त्याकरिता धाडशी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या केंद्रीय मंडळाचे संचालक सतीश मराठे यांनी म्हटले आहे.
मोठे उद्योग बऱ्याचबाबतीत सक्षम असतात. त्याच्याकडे खेळते भांडवल असते. त्याना त्याच्या ब्रॅंडिगमुळे भांडवल उपलब्ध होण्याता अडचणी निर्माण होत नाहीत. मात्र छोट्या उद्योगांना साठी अधिक धाडसी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
गेल्या आठवड्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने सध्याच्या परिस्थितीमध्ये या उद्योगावर जास्त परिणाम होऊ नये यासाठी काही उपाय योजना जाहीर केल्या आहेत. मात्र या उपाययोजना लघु पडल्यात होणाऱ्या परिणामांची काळजी घेणाऱ्या आहेत. आपल्यात हे उद्योग टिकून राहावेत आणि अधिक उत्पादक व्हावेत यासाठी वेगळ्या उपाययोजना करण्यावर विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
करोना व्हायरसमुळे विस्कळीत झालेली व्यवस्था पुढील 3 ते 6 महिन्यात पूर्वपदावर येईल. मात्र या उद्योगावर झालेला परिणाम संपुष्टात येण्यास बराच कालावधी लागू शकतो. अनौपचारिक क्षेत्रातील उद्योग आणीत छोट्या उद्योगासाठी अधिक धाडसी उपाययोजना आवश्यक आहेत. आगामी काळात कर्ज परतफेडीचे बरेच प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅंकांना खराब कर्जापोटी करावयाच्या तरतुदीच्या रकमेवर फेरविचार करावा लागणार आहे.
सर्वच वैयक्तिक आणि रिटेल कर्जाची फेररचना करण्याच्या शक्यतेवरही विचार करावा लागेल असे त्यांनी सांगितले. सध्या रिझर्व बॅंकेने 3 महिने कर्जाचा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. मात्र तरीही या काळात उद्योगांची कसलीही उलाढाल होणार नसताना त्यांना व्याज मात्र द्यावे लागणार आहे. माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी सरसकट तीन महिने मुदतवाढ देण्याची गरज होती. त्याचबरोबर यातील व्याज या तीन महिन्यामध्ये द्यावे लागणार नाही अशी तरतूद करण्याची गरज होती असे म्हटले आहे. ग्राहकांनीही अशाच प्रकारच्या उपाययोजनांची अपेक्षा केली होती.