बीजिंग – गलवान खोऱ्यातील रक्तरंजित झटापटीनंतर भारत व चीन दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आज, हा द्विपक्षीय वाद चर्चेतून सोडवण्यात भारत व चीनच्या सैन्यदलांना यश आले असून सीमेवर शांतता नांदावी याबाबत एकमत झालं असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.
काल १४ कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग व चीनचे तिबेट मिलिटरी डिस्ट्रिक्ट्चे मेजर जनरल लिऊ लिन यांच्या दरम्यान ११ तासांची दीर्घ बैठक झाली होती. यानंतर आज चीनचे परराष्ट्र मंत्री झाओ लिजियान यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, “भारत व चीन सैन्य अधिकाऱ्यांमध्ये झालेली बैठक ही दोन्ही देश आपापसातील वाद चर्चेद्वारे सोडवण्यास तयार असल्याचं द्योतक आहे. या बैठकीमध्ये दोन्ही देशांनी वादाचे मुद्दे सोडवण्यासाठी व सीमेवर शांतता ठेवण्यासाठी द्विपक्षीय चर्चा व एकत्रित प्रयत्न सुरु ठेवण्याबाबत सहमती दर्शवली.” अशी माहिती दिली.
यावेळी पत्रकारांनी झाओ लिजियान यांना गलवान खोऱ्यात चीनचे किती सैनिक मारले गेले असा प्रश्न विचारला असता, “काही माध्यमांमध्ये चीनचे ४० जवान मारले गेल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की हे वृत्त चुकीचे आहे.”
सीमेवरील सैन्य मागे घेण्याबाबतच्या भारतीय लष्कराच्या दाव्याबाबत प्रश्न विचारला असता लिजियान यांनी, “याबाबतची अधिकृत माहिती सीमेवर तैनात असलेल्या सैन्य अधिकाऱ्यांकडे असून मी याबात कोणतीही माहिती देऊ शकत नाही.” असं उत्तर दिलं.
डिजिटल प्रभात आता टेलेग्रामवर! जॉईन करण्यासाठी खालील लिंकरवर क्लिक करा https://t.me/edainikprabhat