विजय शेंडगे
काही कादंबऱ्या, काही कवितासंग्रह नावावर असणाऱ्या नितीन शिंदे यांचा “वावधान’ हा कथासंग्रह म्हणजे आठवं पुस्तक. हा कथासंग्रह लिहिताना लेखकाला लेखनाचा प्रदीर्घ अनुभव असल्याचे लक्षात येते. “मास्टर’, “एक चुकलेली लोकल’, “सॉरी जफर’, “ती, मी आणि तो’, “सायलेंट किलर’ आणि “वावधान’ अशा सहा कथा या संग्रहात आहेत.
कथाविषय नेहमीचेच असले तरी लेखकाची कथा मांडणीची वेगळी शैली त्या कथांना वेळेपण देते. “मास्टर’ या कथेत लेखकाने कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरील शिक्षकांच्या प्रश्नांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आंदळकर या शिक्षकाची व्यक्तिरेखा आपल्याला या कथेत दिसते. परिस्थितीला वैतागून एका “मास्तर’चा “मास्टर’ कसा होतो, हे रंगवताना मास्तर आणि मास्टर या शब्दातील नेमका भेद लेखकाने दाखवून दिला आहे.
या सर्व कथा माणसातली हरवत चाललेली माणुसकी, धार्मिक भेद, आधुनिकीकरण यामुळे मानवाच्या आयुष्यात कशी वावधाने अर्थात वादळे येऊ शकतात हे सांगतात. मानवी आयुष्यातील
दुःखाच्या, वेदनेच्या या कथा असल्यामुळे त्या निराशावादाकडे झुकतात. कथासंग्रह वाचून झाल्यावर आपल्या मनावर एक निराशेचं मळभ दाटून येतं.
“एक चुकलेली लोकल’ या कथेतील मुस्कान ही एक अत्यंत हसमुख तरुणी. तिच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असतं. तर युवराज हा तरुण नेहमीच गंभीर असतो. परंतु तिचं हसू आणि त्यांचं गांभीर्य याचं कारण एकसारखं असतं. कसं? ते ही कथा वाचल्यावर लक्षात येते.
लेखकाने नेहमी आशावाद पेरायला हवा. कसदार लेखन, भाषेचा वेगळेपणा, शब्द चमत्कृतीचा नेमका वापर, आटोपशीर प्रसंग अशा अनेक जमेच्या बाजू “वावधान’ या कथासंग्रहात दिसतात. परंतु हा कथासंग्रह आयुष्याच्या दशा दाखवतो. त्यामुळे मनावर निराशेचे सावट दाटून येते. असं असलं तरी या कथा आपल्याला विचार करायला लावतात आणि विचार करू शकणाऱ्या माणसाच्या आयुष्याला या कथा दिशा देतील हेही नक्की.
स्वप्नांना सब्स्ट्रॅक्ट करणे, निर्जीव वस्तूंचे भाव वाढताना सजीव माणसांचे भाव कमी होत चालले आहेत हे दुनियेचं मॅथेमॅटिक्स, मनातल्या लाव्ह्यावर नम्रतेचं पांघरून, आयुष्याचा वर्ग न होता वर्गमूळ होणे, पायाखाली आग लागल्यावर महाल बांधून काय उपयोग असं आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगणारी अनेक विधानं या कथासंग्रहात भेटतात. ही या कथासंग्रहांची जमेची म्हणावी अशी बाजू. निराशावादाला तोंड देण्याची ज्या वाचकांची तयारी आहे त्यांना हा कथासंग्रह नक्की आवडेल.