शर्मिला जगताप
शरणकुमार लिंबाळे यांना नुकताच साहित्यातील मानाचा सरस्वती सन्मान जाहीर झाला. त्यामुळे त्यांच्या “अक्करमाशी’ या आत्मकथन पुस्तकाबाबत जाणून घेऊ या.
खरेतर दलित साहित्य, ग्रामीण साहित्य हा साहित्यप्रकार लिंबाळे यांनी हाताळला आहे. त्यांच्या अक्करमाशी या पुस्तकाबाबत मराठी साहित्यातील दिग्गज लेखक भालचंद्र नेमाडे म्हणतात, मराठी वाचकाला एका सर्वस्वी नव्या अनुभव क्षेत्रात नेऊन सोडणाऱ्या अक्करमाशी या संयमशील आत्मकथनात माणुसकीचा प्रगल्भ प्रत्यय देण्याचं सामर्थ्य आहे.
ही संयमशीलता शरणकुमार लिंबाळे यांना प्रखर जीवनानुभवनातूनच नव्हे तर जीवनाकडे गंभीरवृत्तीने पाहण्याच्या यथार्थदर्शनातून प्राप्त झाल्याचे पानोपानी जाणवते. दलित साहित्याने आधुनिक मराठी कथनाला एका विशाल सामाजिक पटावर आधीच नेऊन ठेवलं आहे. परंतु शरणकुमार लिंबाळे ह्यांनी दलितत्वाच्याही सीमा संकुचित वाटतील अशा निव्वळ मानवी परिघावर आपली कथावस्तू उभारली आहे.
मराठी साहित्य क्षेत्रातील मान्यवर लेखक गंगाधर पानतवणे अक्करमाशी बद्दल लिहितात की, “अक्करमाशी’ हे शरणकुमार लिंबाळे यांचे आत्मकथन तर आहेच पण या देशातील सभ्य आणि सुसंस्कृत म्हणविल्या जाणाऱ्या मानसिकतेचे वस्रहरणही आहे. केवळ मूकपणे अन्याय-अत्याचार न साहता या सांस्कृतिक बलात्काराची जीवघेणी झाडाझडतीही शरणकुमार लिंबाळे यांनी घेतली आहे. शरणकुमार लिंबाळे यांनी आपली कैफियत अगदी बिनधास्तपणे मांडली.
मराठी साहित्यातील नामवंत ग्रामीण साहित्यिक जर्नादन वाघमारे लिहितात की, “अक्करमाशी’ या आत्मकथेमध्ये दोन आवाज आपल्याला ऐकू येतात. दलित समाजाची वेदना व्यक्त करणारा प्रातिनिधिक असा एक विद्रोही आवाज. आणि लिंबाळे यांच्या स्वतःच्या अशा सखोल अंतर्वेदनेला मुखरित करणारा आर्त असा दुसरा आवाज. बहिष्कृत समाजानेच बहिष्कृत केलेला हा तरुण आहे. एका वेगळ्या अर्थाने हा लेखक “यातिहीन महार’ आहे. अक्करमाशी ही त्याच्या दुःखयात्रेची कथा आहे.
हे पुस्तक दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. आत्मकथन हा साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. अक्करमाशी या आत्मकथनात तत्कालिन समाजजीवनाचेही दर्शन वाचकांना घडते. हे आत्मकथन वाचल्यानंतर अनेक दिवस हे कथन वाचकांच्या नजरेसमोर फिरते. एक सिद्धहस्त लेखक असलेले लिंबाळे यांनी ग्रामीण भाषेला एका उच्च स्थानी नेऊन पोहोचवले आहे, हेही विशेष. पुनःपुन्हा वाचावे आणि संग्रही असावे असे हे पुस्तक आहे.