Mithun Chakraborty : बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासह त्यांच्या डान्समुळे ते अधिक ओळखले जातातनुकतेच त्यांनी एका रिअॅलिटी शोमध्ये त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. त्यांच्या ब्रेकअपबद्दल त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. इतकेच काय तर मिथुन दा ब्रेकअपनंतर सुपरस्टार झाले होते असेही सांगितले आहे.
मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, “माझ्या आयुष्यात प्रचंड वाईट वेळ आली होती. मी एका मुलीवर प्रचंड प्रेम करत होतो. पण ती मला सोडून निघून गेली. पण तेव्हा माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. ती गेली पण मी सुपरस्टार झालो. एकदा अचानक ती मला ट्रेनमध्ये दिसली. तिने मला पाहिलं आणि ती लपली. मी तिच्याकडे गेलो आणि म्हणालो, तू मला सोडले हे चांगले केले. प्रत्येकाच्या आयुष्यात एक कठीण वेळ येते.”
पुढे ते म्हणाले, “मी आलेल्या अनुभवांवरुन सर्वकाही शिकलो आहे. प्रेम करणं, प्रेम होणं अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण प्रेमात आंधळं होणं फार वाईट गोष्ट आहे. माझ्याकडे देण्यासाठी काहीही नव्हतं. घर नव्हते. पोट भरण्यासाठी देखील पैसे नव्हते. तिला पश्चाताप झाला आणि ती ढसाढसा रडू लागली. तेव्हा मी तिला म्हणालो, आज मी जे काही आहे, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आहे.” सध्या सर्वत्र मिथुन चक्रवर्ती यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, यापूर्वी मिथुन चक्रवर्ती यांचे अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले आहे. त्यांचे दोन विवाह झाले आहेत. मिथुन चक्रवर्ती यांनी पहिले लग्न हेलेना ल्यूकशी 1979 मध्ये केले होते. पण हे लग्न केवळ चार महिनेच टिकले आणि त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर मिथुनने त्याच वर्षी अभिनेत्री योगिता बालीसोबत लग्न केले.