– माधव विद्वांस
मराठी भाषेतील नामवंत गझलकार, शायर, कवी व जिंदादिल या नावाने ओळखले जाणारे भाऊसाहेब तथा वासुदेव वामन पाटणकर यांचा आज स्मृतिदिन. 29 डिसेंबर 1908 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शिक्षकी पेशातील होते. पाटणकरांनी सीतारामशास्त्री कुरुंभट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वेद, तत्त्वज्ञान आणि इतर शास्त्रांचा अभ्यास केला.
भाऊसाहेब हे पेशाने वकील होते. यवतमाळ जिल्हा न्यायालयात ते फौजदारी वकिली करायचे. खटला जिंकणारे वकील म्हणून त्यांची ख्याती होती. न्यायालयीन कामकाजातील किचकट बाबी हाताळताना त्यांच्यातील कवी, लेखक जागाच होता. ते उत्तम शिकारी म्हणूनही ओळखले जायचे. वर्ष 1929 मधे इंदू दाते यांच्याशी त्यांचा विवाह झाला. कालांतराने त्यांची दृष्टी अधू झाल्याने कविता सुचल्यावर ते पत्नी इंदू यांना रचना ऐकवत आणि त्या कविता लिहून घेत असत.
त्यावेळी मराठी काव्य प्रकारात शेर लिहायचे धाडस कोणी केले नव्हते. पाटणकरांचा संस्कृतचा गाढा अभ्यास होता. त्यांची शब्द संपदा चांगली होती. त्यांनी शेरोशायरी प्रकारात काव्य करण्याचे ठरविले. मराठी मातीशी, संस्कृतीशी नाते जोडणारे शेर त्यांनी मराठीत लिहायचे ठरविले. जंगलात प्राण्यांच्या मागे माग काढत जाणारे भाऊसाहेब निसर्गप्रेमी होते.
त्यांच्या वकिली पेशातील वापरले जाणारे डावपेच हे इंग्रजी, मराठी किंवा कोणत्याही भाषेतूनच वकील मांडत असतात. मग भाऊसाहेबांना शायरी मराठीत आणणे अवघड नव्हते. “मराठी शायरी’ आणि “मराठी मुशायरा’ ही दोन पुस्तके त्यांनी लिहिली. हे दोनही शब्द भाऊसाहेब पाटणकर यांनीच या पुस्तकातून मराठीत प्रचारात आणले. दोन्ही पुस्तकात मराठी हा शब्द मी भाषेच्या दृष्टीने न वापरता संस्कृतीच्या अर्थाने वापरला आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
उर्दू ही भाषा साधारणत: सम्राट अकबराच्या काळात हिंदी, फारसी आणि अरेबिक भाषेच्या संगमातूनच वापरात आली. अकबर साहित्याचा भोक्ता असल्याने त्याच्या दरबारात काव्य मैफिली व्हायच्या. परंतु पुढे औरंगजेबाने सर्व मैफिली बंद केल्या होत्या. उत्तर मोंगलाईत साम्राज्य बुडाले; पण उर्दू शायरी बहरात आली. मराठी कवींना उर्दूप्रमाणे शेर शायरी मराठीत करता येईल याचा विश्वास नसावा; परंतु भाऊसाहेबांनी उर्दूचा जोश व शब्दफेक मराठीतही होऊ शकते हे दाखवून दिले.
।। खेळलो इश्कात जैसे, बेधंद आम्ही लोळलो।। ।। लोळलो मस्तीत, नाही पायी कोणाच्या लोळलो।। अशा काव्य रचनेतून मराठी बाणा दाखवून दिला आहे. पाटणकरांच्या शायरीचे कार्यक्रम महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही होत असत. माणसाच्या निधनानंतर त्याची जागा काय असते हे दाखवून देणारी काव्य रचना- ।। एकदा मेल्यावरी मी परतुनी आलो घरी।।
।। तेच होते दार आणि तीच होती ओसरी।।
।। होती तिथे तसबीर माझी भिंतीवरी टांगली ।।
।। खूप होती धूळ आणि कसर होती लागली।।
पाटणकरांचे 20 जून 1997 रोजी निधन झाले.