कोलकाता – पश्चिम बंगालमधील भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसचा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात, केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राज्य सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, तृणमूल कॉंग्रेसचे नेते आणि ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले पार्थ चटर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे. भाजपकडून राजकीय स्वार्थासाठी गृह मंत्रालयाचा वापर केला जात असल्याचा दावा चटर्जी यांनी केला आहे.
उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये जेव्हा लहान मुलांना आणि यादव समुदायाच्या लोकांना मारले गेले त्यावेळी भाजप नेते कुठे होते. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार घडवून, तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हत्याच्या घटना भाजपकडून घडवून आणल्या जात असल्याचा आरोप चटर्जी यांनी केला.
दिल्लीत बसलेल्या भाजप नेत्यांना पश्चिम बंगालमधील परिस्थिती कळणार नाही.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही बंगालमधील हिंसाचाराच्या घटना सुरूच आहे. या सर्व घटनांची केंद्रीय गृह मंत्रालयाने गंभीरपणे दखल घेतली आहे. या संदर्भात केंद्र सरकार पश्चिम बंगालच्या राज्यपालांशी संपर्कात आहे.