हैदराबाद – देश तोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना जम्मू-काश्मीरच्या जनतेने नाकारले आहे. आता तमिळनाडूची जनताही तेच करणार आहे. तामिळनाडूच्या भूमीवर प्रचंड बदल झाल्याचे मला दिसत आहे. यावेळी तामिळनाडूमध्ये भाजपची कामगिरी द्रमुक आणि काँग्रेसच्या इंडी आघाडीचा सर्व अहंकार नष्ट करेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदींची शुक्रवारी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी १९९१ मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर व काश्मीर ते कन्याकुमारीच्या एकता यात्रेची आठवणही काढली. पंतप्रधानांचा १७ दिवसांत हा दुसरा तामिळनाडू दौरा आहे. यापूर्वी २८ फेब्रुवारी रोजी त्यांनी थुथुकुडी येथे १७,३०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली होती. यामध्ये देशातील पहिले हायड्रोजन हब बंदर आणि अंतर्देशीय जलमार्ग आणि कुलशेखरपट्टीनम येथील इस्रोचे नवीन प्रक्षेपण संकुल यांचाही समावेश आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, इंडिया आघाडी कधीही तामिळनाडूचा विकास करू शकत नाही. या लोकांना घोटाळ्यांचा इतिहास आहे. या लोकांच्या राजकारणाचा आधार जनतेला लुटण्यासाठी सत्तेवर येण्याचा आहे. एकीकडे भाजपच्या कल्याणकारी योजना आहेत, तर दुसरीकडे कोट्यवधींचे घोटाळे आहेत.
आम्ही ऑप्टिकल फायबर, ५-जी, डिजिटल इंडिया योजना दिली. इंडी अलायन्सच्या नावावर लाखो कोटींचा टूजी घोटाळा झाला आहे आणि त्या लुटीत द्रमुक सर्वात मोठा भागधारक होता. आमच्या नावावर उडान योजना आहे, इंडिया आघाडीच्या नावावर हेलिकॉप्टर घोटाळा आहे. आमच्या खेलो इंडिया आणि टॉप्स योजनांमुळे देशाने क्रीडा क्षेत्रात उच्च दर्जा प्राप्त केला, परंतु त्यांचे नाव राष्ट्रकुल घोटाळ्यामुळे कलंकित झाले असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले.
दक्षिणेवर लक्ष…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी १६ आणि १८ मार्च रोजी तेलंगणामध्ये निवडणूक रॅली घेणार आहेत. ते येथे एनडीएच्या उमेदवारांसाठी मते मागणार आहेत. ते १६ मार्चला नगरकुर्नूल आणि १८ मार्चला जगतियालमध्ये रॅली काढणार आहेत. १९ मार्च रोजी पंतप्रधान पलक्कड, केरळला जाणार आहेत. त्यांचा तेथे रोड शो येथे होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपाने दक्षिणेवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे.
पंतप्रधानांच्या भाषणातील मुद्दे
-इंडी अलायन्समधील लोकांचा घोटाळ्यांचा इतिहास
-उत्तर दक्षिण कॉरिडॉरचा पाया अटलजींनी घातला होता
-द्रमुक हा तामिळनाडूच्या भूतकाळाचा आणि वारशाचाही शत्रू
-फाशीची शिक्षा झालेल्या मच्छिमारांना भारतात आणण्यात आले