अहमदनगर: पार्थर्डी तालुक्यातील भारजवाडी या गावातील कर्जबाजारी शेतकरी मल्हारी बटुळे यांनी काल रात्री आत्महत्या केली. दरम्यान, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पार्थर्डी येथे आत्महत्याग्रस्त मल्हारी बटुळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
यावेळी भाजपच्या वतीने आत्महत्याग्रस्त बटुळे कुटुंबियांना एक लाखाची मदत सूपूर्द केली. त्याचप्रमाणे बटुळे यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी भाजप उचलणार असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले. तसेच बटुळे यांच्या पत्नीसाठी शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले. यावेळी शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनीही बटुळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
दरेकर म्हणाले, “हा हृदय हेलावणारा प्रसंग आहे. सरकार कर्जमाफी करत असताना शेतकरी आत्महत्या होत आहेत. यावर विचार करणे गरजेचे आहे. सरसकट कर्जमाफी झाली असती, तर ही वेळ आली नसती. सरकारने सरसकट कर्जमाफी न केल्यामुळे ही आत्महत्या झाली आहे.”
सरकारने सरसकट कर्जमाफी न केल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप केला. ही कर्जमाफी सरसकट नाही. ठाकरे सरकारने सरसकट कर्जमाफी करू म्हणून सांगितलं. मात्र तसं झालं नाही. शेतकऱ्यांच्या जेवढ्या प्रकारचे कर्ज आहे, त्याला एकदम मोकळं करा. कर्जमाफी तात्पुरती करुन उपयोग होणार नाही.