मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून सरकारला बदनाम करण्याचे काम वेळोवेळी झाले आहे. पण भाजपचे सत्तेत येण्याचे स्वप्न पूर्णपणे भंगले आहे, असा टोला प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.
भाजप समाजमाध्यमांवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून राज्य सरकारला बदनाम करत आहे, यातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप तपासे यांनी केला.
शिवसेना हा वेगळा पक्ष असून त्याची वेगळी विचारधारा आहे. मात्र 2019 मध्ये किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर राज्यात सत्ता स्थापन करण्यात आली. हे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपची पोटदुखी वाढली. अनेक मुहूर्त काढून हे सरकार पडण्याची वक्तव्ये केली गेली. मात्र हे सरकार तीन वर्षांपासून पडलेले नाही. पुढची दोन वर्ष गुण्यागोविंदाने पूर्ण करून 2024 मध्येही महाविकास आघाडी सरकार पुन्हा निवडून येईल, असा विश्वास महेश तपासे यांनी व्यक्त केला.