नगर -तीन तीघाडा.. काम बिगाडा..! उद्धव बोलतात “करोनासे डरोना डरोना.. पण त्यांनाच करोना रोखता येईना, उद्धव सरकार हाय हाय. अशा विविधांगी नव्या घोषणांनी आज आनंदधामजवळील परिसर दणाणून गेला. माजी खासदार तथा पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांच्या निवासस्थानासमोर आज “मेरे घर के आंगण मे’ आंदोलन रंगले.
करोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्तीत केंद्र सरकारने प्रभावी उपाय योजनानांबरोबरच मोठ्या प्रमाणात पॅकेज देऊन जनतेला दिलासा दिला. मात्र, राज्यातील आघाडी सरकार केंद्र सरकारने दिलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरत आहे. म्हणूनच करोनाच्या बाबतीत आपला महाराष्ट्र आज देशात आघाडीवर आहे. सर्व प्रसाशकीय यंत्रणा आज अहोरात्र राबत आहे. मात्र सरकारने त्यांना ज्या पद्धतीने सुविधा, सहकार्य देणे आवश्यक आहे, त्या सुविधा दिल्या जात नाहीत, असा आरोप माजी खासदार तथा शहर-जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी यावेळी केला.
नगरमधील करोनाचा प्रादुर्भाव आता बऱ्यापैकी नियंत्रणात आल्यावर सरकारने दिरंगाईने येथे टेस्टींग लॅब उघडली आहे. केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेले रेशनवरील धान्य वाटपही सरकारला व्यवस्थित वाटप करता आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात राबवलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे व वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे जगाच्या मनाने करोनाबाबतीत भारत चांगल्या स्थितीत आहे.
त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इतर मोठे राष्ट्रही मार्गदर्शन घेत आहेत. मात्र, राज्य सरकार मोदींना दोष देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भरपूर बोलत आहेत. मात्र प्रत्यक्ष उपाययोजनांची कृती करण्यास सपशेल अपयशी ठरत आहेत. त्याबद्दल भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री व आघाडी सरकारचा निषेध करत आहे, असा आरोप गांधी यांनी केला.