आगरतळा – तृणमूल कॉंग्रेसचे सरचिटणीस खासदार अभिषेक बॅनर्जी हे सध्या त्रिपुराच्या दौऱ्यावर आले असून त्यांच्या या आगमनाच्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना ठिकठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
त्रिपुराच्या विमानतळावरून बॅनर्जी थेट त्रिपुरेश्वर मंदिरा कडे दर्शनासाठी जात असताना त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या गाडीवर लाठ्यांनी हल्ला करण्याचाही प्रकार घडला, पण त्यात त्यांना कोणतीहीं इजा झाली नाही.
या घटनेवरून राज्यातील भाजप सरकारला टोमणा मारताना बॅनर्जी यांनी म्हटले आहे की हीच भाजपची त्रिपुरातील लोकशाही आहे. त्रिपुराला या बाबतीत नव्या उंचीवर नेल्याबद्दल भाजपचे अभिनंदन असेही त्यांनी म्हटले आहे. त्रिपुरेश्वर मंदिराच्या परिसरातही भाजप कार्यकर्त्यांनी बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.