काटेवाडीतून संवाद सुरू करणार
बारामती/ जळोची : देशात अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. गड कोणाच्या एकाच्या मालकीचा राहत नाही, हा देशाचा इतिहास आहे. शरद पवारांचा गड 2024 ला भाजपाने जिंकलेला दिसेल. असे भाकित भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात केली.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघात भाजपा रणनीती आखत आहे. त्या पार्श्वभूमीवर बावनकुळे हे दोन दिवसीय बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर टीकेचे आसूड ओढले. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहूल कुल, आमदार गोपीचंद पडळकर, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे, दिलीप खैरे, पांडुरंग कचरे, सतीश फाळके आदींची उपस्थिती होती.
देशात शरद पवार यांच्या नेतृत्वात विरोधकांची मोट बांधली जात असल्याच्या प्रश्नांवर बावनकुळे म्हणाले, पवार यांचा तो अधिकार आहे. प्रत्येकाला आपले संघटन वाढविण्याचा अधिकार असतो. परंतु राज्यात राष्ट्रवादीचा इतिहास पाहिला तर आठ जागांवर हा पक्ष गेला नाही.
ते म्हणाले, प्रत्येक बुथवर पदाधिकाऱ्याना ताकद मिळाली पाहिजे, यासाठी काटेवाडीत जात आहे. दिवसभरात अनेकांना भेटणार असून जनतेची निवेदने स्वीकारून ती सरकारकडे पाठवणार आहे. बारामतीत प्रत्येकाला यावंसं वाटत, असे खासदार सुळे म्हणाल्याच्या प्रश्नांवर ते म्हणाले, सुळे काय म्हणाल्या, हे मला माहिती नाही. परंतु केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण बारामती दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यात खासदार म्हणून सुळे त्यांना भेटू शकतात. बारामतीसह राज्यातील सर्व जागांवर आम्ही लढणार आहोत. आमची संघटना वाढवणे, ही पक्षाची जबाबदारी आहे. त्यामुळे बारामतीची जागा जिंकायची हा आमचा निश्चय आहे. त्यामुळे आम्ही कोणाविरुद्ध लढतोय हा अजेंडा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप बारामतीची जागा कोणत्याही स्थितीत निवडून आणेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांची प्रशंसा करीत असताना बारामती टार्गेट का, या प्रश्नांवर ते म्हणाले, एखाद्याने चांगले काम केले तर त्यांची प्रशंसा करण्यात गैर काय. परंतु बारामती मतदारसंघात अजूनही 45 टक्के जनता उपेक्षित आहे. मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बारामती मतदारसंघाबाबत चर्चा झाली नाही. त्यांनी गणेशाचे दर्शन घेत राज्याची संघटनात्मक बैठक घेतली आहे. सीतारामण हे बारामती मतदारसंघाच्या प्रभारी आहेत.
पुढील दीड वर्षांत त्यांचे पाच ते सहावेळा प्रत्येकी तीन दिवसांचे दौरे होतील. केंद्र, राज्याच्या योजना त्या जनतेपर्यंत पोहोचवतील. केवळ घोषणाबाजी, चर्चा नव्हे तर पक्ष मजबूत करून आजवरची सर्वात मोठी लढाई आम्ही 2024 ला लढू आणि जिंकू.