बंगळुरू – कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के.एस.ईश्वरप्पा यांच्या बंडखोरीची गंभीर दखल भाजपने घेतली आहे. ईश्वरप्पा अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत भाजपने दिले आहेत.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष असणारे ईश्वरप्पा त्यांच्या मुलाला हावेरीमधून रिंगणात उतरवण्यास उत्सुक होते. मात्र, भाजपने मुलाला तिकीट नाकारल्याने ईश्वरप्पा यांनी बंडाचे निशाण फडकावले. मुलाला डावलण्यामागे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष पुत्र बी.वाय.विजयेंद्र असल्याचा जाहीर आरोप त्यांनी केला.
एवढेच नव्हे तर, त्यांनी शिवमोग्गा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या मतदारसंघातून येडियुरप्पा यांचे दुसरे पुत्र आणि विद्यमान खासदार बी.वाय.राघवेंद्र निवडणूक लढवत आहेत. ईश्वरप्पा ज्येष्ठ नेते असल्याने त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न भाजपच्या गोटातून करण्यात आले. मात्र, त्या प्रयत्नांना यश आले नाही.
माघार घेण्यास तयार नसल्याने ईश्वरप्पा यांना अखेर कारवाईचा इशारा देण्यात आला. विजयेंद्र यांनी त्याविषयी सूतोवाच केले. आतापर्यंत ईश्वरप्पा यांच्याबाबत सबुरीचे धोरण पत्करणाऱ्या भाजपने प्रथमच आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटकमध्ये भाजपचा विस्तार करण्याचे श्रेय येडियुरप्पा आणि काही मोजक्या नेत्यांना दिले जाते. त्या नेत्यांमध्ये ईश्वरप्पा यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांची बंडखोरी चर्चेचा विषय बनली आहे. ती चर्चा भाजपची डोकेदुखी वाढवणारी आहे.