कोलकता – लोकसभा निवडणुकीत देशभरात ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने समोर ठेवले आहे. मात्र, तो पक्ष २०० जागाही जिंकू शकणार नाही, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केला.
बंगालमध्ये २०२१ यावर्षी विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी विधानसभेच्या २९४ पैकी २०० हून अधिक जागा जिंकण्याचे भाकीत भाजप करत होता. मात्र, तो पक्ष सत्तरीपर्यंतच मजल मारू शकला. त्यातील १० आमदार तृणमूलमध्ये आले आहेत.
आता लोकसभा निवडणुकीत भाजप ४०० जागांविषयी बोलत आहे. त्या पक्षाने आधी २०० जागा मिळवून दाखवाव्यात, असे ममता एका सभेत बोलताना म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूल केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी मदत करेल.
आगामी काळात आम्ही देश चालवू. मात्र, बंगालमध्ये आम्ही कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांना पाठिंबा देणार नाही. कारण, त्यांनी बंगालमध्ये भाजपशी हातमिळवणी केली आहे, असा आरोप त्यांनी केला.
कॉंग्रेस आणि डावे पक्ष इंडिया या विरोधी पक्षांच्या देशव्यापी आघाडीचे घटक आहेत. त्या आघाडीचाच भाग असल्याची भूमिका तृणमूलकडूनही मांडण्यात येत आहे. मात्र, त्या पक्षाने बंगालमध्ये स्वबळावर लढण्याचा मार्ग पत्करला आहे.