लखनौ – देशात ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यात येते. मात्र मागील अनेक वर्षांपासून ईव्हीएम मशिनवर संशय घेण्यात येतोय. दर निवडणुकीच्या काळात ईव्हीएमवर चर्चा होते. मात्र त्यातून काहीही साध्य होत नाही. मात्र उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपूर्वीच माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनी ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त केला आहे.
मायावती यांनी म्हटलं की, निवडणूक आय़ोगाने उत्तर प्रदेशातील निवडणूक भयमुक्त आणि निष्पक्ष पद्धतीने घ्यावी. त्या माध्यमांशी बोलत होत्या. निवडणूक आयोग निष्पक्ष असणे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं.
दरम्यान निवडणूक आयोगाने निवडणूक निष्पक्षपणे घेतल्यास आणि ईव्हीएममध्ये कोणतीही अफरातफर न केल्यास उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव निश्चित असल्याचं मायावती यांनी म्हटलं. तसेच निवडणूक होऊ घातलेल्या पाच राज्यांत निवडणूक शांतेत पार पडावी. पोलिसांनी देखील निष्पक्षपणे काम करावं. तर उत्तर प्रदेशच्या नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान करण्याचं आवाहन देखील मायावती यांनी केलं.
सध्या उत्तर प्रदेशात भाजप आणि समाजवादी पार्टी पूर्ण ताकदीने प्रचार करत आहे. अखिलेश यादवच्या नेतृत्वात सपा भाजपला जोरदार टक्कर देण्याची तयारी करत आहेत. तर मायावती देखील पक्षातील नेत्यांसोबत बैठका घेऊन त्यांचं मनोबल वाढवत आहेत.