नवी दिल्ली – दिल्लीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात आघाडी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची स्थिती भक्कम झाल्याचे मानले जाते आहे.
मात्र येणाऱ्या निवडणुकीत दिल्लीतील सात जागांवर मतदारांची पसंती कोणाला असे सर्वेक्षण करण्यात आल्यावर त्यातून धक्कादायक निष्कर्ष बाहेर आले असून दिल्लीचे मतदार पुन्हा एकदा सातही जागांवर भारतीय जनता पार्टीच्या नावावर मोहोर उमटवणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सच्या सर्वेक्षणानुसार आप आणि कॉंग्रेस एकत्र आले असले तरी सर्व जागा भाजपला मिळतील. गेल्या वेळेच्या लोकसभा निवडणुकीतही भाजपचेच दिल्लीत वर्चस्व राहीले होते.
उमेदवार बदलल्याचा फायदा
भाजपने केवळ उत्तर पूर्व दिल्लीत भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. अन्य सहाही ठिकाणी त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांचे तिकिट कापून त्यांच्या जागी बांसुरी स्वराज यांना नवी दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. दक्षिण दिल्ली, चांदनी चौक आणि पूर्व दिल्ली अशा सगळ्यांच ठिकाणी भाजपने उमेदवार बदलले आहेत. त्याचाही पक्षाला लाभ मिळण्याची शक्यता आहे.