रायगड – लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीला सिंधुदुर्गातील कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील ३ पुरुष व ४ महिलांना अहमदनगर, श्रीरामपूर, पंढरपूर व सातारा येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सराईत टोळीने कुडाळ तालुक्यातील एका व्यक्तीचे लग्न लावून दिले होते. यासाठी त्या व्यक्ती कडून १ लाख ४० हजाराची रक्कम घेतली होती. लग्नाच्या दुसर्याच दिवशी नवरी घरातून पळून गेली होती.
फसवणूक झालेल्या नवरदेवाने लागलीच कुडाळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
यातील संशयित नववधूसह परजिल्ह्यातील ७ जणांच्या टोळीला पकडण्यात कुडाळ पोलिसांना यश आले आहे. यातील २ संशयित पसार असून, त्यांच्यासह दोन स्थानिक मध्यस्थींनाही लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहीती कुडाळ पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी दिली.
यातील तक्रादार हे ४२ वर्षीय असून, ते मागील चार वर्षांपासून लग्नाकरिता स्थळ पाहत होते. त्यांची ओळख एक महिन्यापूर्वी अझिज सुलेमान नाईक (रा. माणगाव, ता. कुडाळ) व महेश श्रीकांत पाटकर (रा. पाट दळवीवाडी, ता. कुडाळ) यांच्याशी झाल्यानंतर त्यांना तक्रारदार यांनी लग्नासाठी मुली पाहत असल्याचे सांगितले.
नाईक व पाटकर यांनी एक मुलगी आपल्या परिचीत असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर कुडाळ कोर्टा जवळील पाटेश्वर मंदिरात बोलावून घेऊन त्याठिकाणी नाईक याने चार पुरुष व महिला यांना आणून मुली दाखवली.
तिचे नाव रुपाली दत्ताजी पाटील असल्याचे त्यावेळी सांगितले. त्याठिकाणी असलेल्या इतर व्यक्तींची ओळख त्या मुलीचे नातेवाईक म्हणून करुन दिली. लग्न कार्यासाठी १ लाख ४० हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून त्यांनी घेतले.