अलिगड – भारतीय जनता पक्ष हो खोटे बोलणाऱ्या लोकांचा पक्ष आहे. या पक्षात मोठा नेता मोठ्या स्वरूपात खोटे बोलतो तर त्यांचा लहान नेता लहान स्वरूपात का होईना खोटेच बोलत असतो अशी टिका समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज येथे बोलताना केली.
ते म्हणाले की या लोकांनी दिल्लीतील अमरजवान ज्योत विझवली, पुढील निवडणुकीत ते जर केंद्रात पुन्हा सत्तेवर आले तर ते देशाची घटनाही बदलतील. त्यांनी देशातील प्रत्येक बाब बदलण्याचे प्रयत्न चालवले असले ती यावेळी उत्तरप्रदेशात मात्र येथील जनतेने बाबा मुख्यमंत्र्यांना बदलण्याचा निर्णय घेतला आहे असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी समाजवादी पक्ष चारशे जागा जिंकेल असा दावा त्यांनी केला. लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी आम्ही तीन जागा विरोधकांना सोडत आहोत असेही त्यांनी नर्म विनोदी शैलीत नमूद केले.
उत्तरप्रदेशातील बाबा मुख्यमंत्र्यांनी पोलिस यंत्रणा भंगारात काढली आहे असा आरोप त्यांनी केला. या सरकारने दिल्लीतील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. पण आमचे सरकार येथे सत्तेवर आले तर शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबाना आम्ही प्रत्येकी 25 लाख रूपयांची मदत करू असे आश्वासनही अखिलेश यांनी यावेळी दिले.