मथुरा – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना भारतीय सैनिकांपेक्षा चीनवर अधिक भरोसा आहे असा आरोप संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी केला आहे. राजनाथसिंह सध्या उत्तरप्रदेशातील प्रचार दौऱ्यावर असून आज ते मथुरा येथे एका जाहींर सभेत बोलत होते.
ते म्हणाले की, गलवान खोऱ्यातील हिंसाचाराबद्दल राहुल गांधी यांनी नेमकी वस्तुस्थिती लक्षात न घेता चीनच्या प्रसार माध्यमांतील बातम्यांवर अधिक विश्वास ठेवला. भारताच्या गौरवावर आणि लष्करी ताकतीवर कोणीही हल्ला करू शकत नाही असा दावाही त्यांनी केला.
लडाख भागात जून 2020 मध्ये जो संघर्ष झाला त्या संबंधात राजनाथसिंह म्हणाले की, भारत हे आता कमजोर राष्ट्र राहिलेले नाही असा संदेश आम्ही त्यावेळी जगाला दिला आहे. गलवान मध्ये अनेक भारतीय सैनिक शहीद झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता.
चीनचे सैनिक त्या ठिकाणी कमी प्रमाणात मारले गेले आहेत असेही राहुल गांधी यांनी म्हटले होते याकडे लक्ष वेधून राजनाथसिंह म्हणाले की, या संघर्षाबाबत अलिकडेच ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी एक वृत्त छापले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की गलवान मधील संघर्षात चीनचे किमान 38 ते 50 सैनिक मारले गेले आहेत.
कॉंग्रेसच्या नेत्यांना आमच्या सैनिकांच्या वीरतेवर कोणताही भरोसा दिसत नाही अशी टीकाही त्यांनी केली. उत्तरप्रदेश सरकारच्या कामाचा गौरव करून त्यांनी यावेळी सांगितले की, या सरकारने उत्तरप्रदेशातील माफीयांचे वर्चस्व नष्ट करून या राज्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत.