कोलकाता – पश्चिम बंगाल मध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा तेथे सपशेल धुव्वा उडाला. या पराभवामुळे भाजपचे नेते सैरभैर झाले असून त्यातून त्यांनी एकमेकांनाच जाहीर दूषणे देणे सुरू केले आहे.त्या संबंधात चिंतन करण्यासाठी पक्षाने एका बैठकीचे आयोजन केले होते.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी रविवारी पक्षाच्या निष्क्रीय नेत्यांवर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले की, भूतकाळात जबाबदारी टाळणाऱ्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पराभवावरून विद्यमान पदाधिकाऱ्यांना लक्ष केले आहे. त्यांची ही टीका भाजपचे खासदार लॉकेट चॅटर्जी आणि अन्य नेत्यांना उद्देशून होती असे सांगण्यात येत आहे.
घोष म्हणाले की या पराभवाबद्दल केवळ तृणमुल कॉंग्रेसवर हेराफेरीचा आरोप लावण्याऐवजी पक्षाने पराभवाची खरी कारणे शोधली पाहिजेत. पण ते न करता आज भाजपचेच काही लोक पक्ष संघटनेलाच दोषदेत आहेत. पक्षावर आरोप करणाऱ्या नेत्यांनी प्रथम आपण पक्षासाठी काय केले याची माहिती दिली पाहिजे असे ते म्हणाले. भाजप खासदार लॉकेट चटर्जी यांनी या पराभवाबद्दल प्रदेश भाजपला जबाबदार धरणारी विधाने केली होती. त्यावर दिलीप घोष यांनी त्यांचे नाव न घेता वरील आगपाखड केली.
गेल्या महिन्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत 108 नगरपालिकांपैकी 102 नगरपालिका तृणमुल कॉंग्रेसने जिंकल्या. सीपीआय(एम) आणि हमरो पार्टीने प्रत्येकी एक नगरपालिका जिंकली तर चार नगरपालिकांमध्ये त्रिशंकु स्थिती निर्माण झाली.या निवडणुकीत तृणमुल कॉंग्रेसला तब्बल 64 टक्के मते मिळाली आहेत भाजपला 12.57 टक्के मिळून हा पक्ष तिसऱ्या स्थानावर गेला असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने भाजपपेक्षा अधिक म्हणजे 14.13 टक्के मते मिळवली आहेत.
बंगालमधील पक्षाच्या कार्यशैलीवर अनेकदा टीका करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथागत रॉय यांनी अलीकडेच ट्विट केले की प्रदेश शाखेच्या पदाधिकाऱ्यांची “शहामृगासारखी वागणूक” पक्षाच्या पतनास कारणीभूत ठरली आहे.विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर, भाजपने सुधारात्मक पावले उचलली नाहीत आणि त्याऐवजी विधानसभेत आपली संख्या 3 वरून 77 वर गेल्याचा खोटा अभिमान बाळगला अशा वर्तवणुकीमुळेच पक्षाचा पराभव झाला असे ते म्हणाले.