नवी दिल्ली, – कोळशाची वेगाने वाहतूक व्हावी यासाठी 14 स्वतंत्र रेल्वे मार्ग सुरू करण्याची योजना केंद्र सरकारकडून आखली जात आहे. इंधनाच्या दरवाढीनंतर रेल्वेसह अन्य पर्यायांवर ताण येणार असल्याने सरकारने ही योजना आखली आहे.
कोळसा सचिव ए के जैन यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत या प्रकल्पांची स्थिती आणि प्रगतीचा आढावा घेण्यात आला. कोळसा खाणीतून उत्पादीत झालेल्या कोळशाची जलद वाहतूक व्हावी यासाठी ही उपाययोजना केली जात आहे.
देशातील औष्णिक वीज प्रकल्पांसाठी कोळशाची मोठ्या प्रमाणात गरज लागते. त्यासाठी बऱ्याचवेळा कोळशाची आयात करावी लागते. आयात केलेला कोळसा महाग असल्याने कोळशाची आयात कमी करून देशांतर्गत खाणीतूनच कोळशाचा पुरेसा पुरवठा करण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे.
त्यासाठी वाहतूक साधन हा एक महत्वाचा भाग आहे. तोरी-शिवपूर रेल्वे हा या चौदा प्रस्तावित प्रकल्पांपैकी महत्वाचा मार्ग आहे. या प्रकल्पाचे काम जोरात सुरू असून पुढील वर्षी मार्चपर्यंत तो पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.