पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून शहराच्या राजकीय वर्तुळात शांतता दिसून येत होती. पक्ष पातळीवर होत असलेली आंदोलने आणि पत्रकबाजी सोडता स्थानिक पातळीवर कोणत्याही विशेष हालचाली होत नव्हत्या. महापालिका निवडणूक सातत्याने लांबणीवर पडत असल्याने राजकीय मरगळ दिसून येत होती. अनेकांनी तर आपली जनसंपर्क कार्यालये बंद केली. परंतु भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑक्टोबर महिन्यात महापालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तविताच राजकीय वर्तुळात पुन्हा लगबग सुरू झाली आहे.
महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू होऊन एक वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. या दरम्यान निवडणुकीच्या तारखांबाबत नवनवीन शक्यता समोर येत होत्या आणि मागे पडत होत्या. गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत असलेले माजी नगरसेवक आणि इच्छुकांना यामुळे हात आखडता घ्यावा लागला होता. परंतु आता सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनीच ऑक्टोबरमध्ये निवडणुकांची शक्यता वर्तविल्याने पक्षीय पातळीवर राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. बावनकुळे यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर इतरही पक्ष सक्रिय झाले आहेत.
महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षाचे स्थानिक पातळीवरील नेते एकीकडे एकजुटीच्या घोषणा करताना दिसतात. परंतु दुसरीकडे मात्र अनेक मुद्यांवर हे पक्ष एक-एकटेच लढत असल्याचे दिसून येत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना तर महायुतीत भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे), आरपीआय (आठवले गट) यांच्यात ताळमेळ दिसून येत नाही. विशेषतः आंदोलन आणि कार्यक्रमांमध्ये शहर पातळीवर ही एकजूट दिसून येत नाही. जर ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्या तर आघाडी आणि युतीची गणिते जुळवून एकजूट ठेवणे अवघड जाणार आहे.
तिकीट वाटप ठरणार कळीचा मुद्दा
गेल्या काही दिवसांमध्ये सर्वच पक्षांना अंतर्गत नाराजीला सामोरे जावे लागले आहे. रविवारी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसमोरच अंतर्गत धुसफूस उघड झाल्याच्या चर्चांनी शहराचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याच अनुषंगाने तिकीट वाटप आपण स्वतः करणार असल्याचे सूतोवाच बावनकुळे यांनी केले असल्याचे देखील सांगितले जात आहे. सर्वच पक्षात तिकीट वाटप अर्थात नगरसेवक पदाची उमेदवारी हा सर्वांत कळीचा मुद्दा ठरणार आहे.
कर्नाटक, उत्तरप्रदेशचे निकाल महत्त्वाचे
येत्या काही दिवसांमध्ये कर्नाटक विधानसभा आणि उत्तरप्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. विशेषतः कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात राज्य पातळीवरील वरिष्ठ पदाधिकारी गुंतले आहेत. या निवडणुकांचे निकाल महत्त्वाचे ठरणार असून यावरुन महापालिका निवडणुकांची रणनीती ठरणार असल्याची चर्चा आहे.