मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून निवडणुक आयोगाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज (28 मार्च) केला. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे.
त्याचा निकाल लागलेला नसतानाही बावनकुळे यांनी निकाल लागल्याचा दावा करून न्यायालयाचा अवमान केला आहे. हा गंभीर गुन्हा असून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात अतुल लोंढे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. 28 मार्च 2024 रोजी खासदार नवनीत राणा यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी, सर्वोच्च न्यायालयाने खासदार नवनीन राणा प्रकरणी निर्णय दिलेला आहे, अशा प्रकारचा चुकीचा आणि दिशाभूल करणारा दावा खोटा आहे.
अशा पद्धतीचे विधान जाणीवपूर्वक करून खोटी माहिती पसरवली जात आहे. हा प्रकार मतदारांवर प्रभाव टाकण्यारा आहे, तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत गुन्हा आहे, असे अतुल लोंढे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.